उद्योगपतींची कर्जे सरसकट माफ; मग शेतकऱ्यांवर कर्जमाफीच्या अटींचे ओझे का?

मंचर : राज्य सरकारने सरसकट कर्जमाफी करण्याऐवजी शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी (ता. ११) मंचर येथील प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाच्या कर्जमाफी निर्णयाची होळी करून निषेध नोंदविला. यावेळी शेतकऱ्यांनी राज्यशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या.

पिंपळगाव चौकातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा प्रांत कार्यालयावर गेला. अग्रभागी प्रकाश कोळेकर,संतोष पवार,काळूराम सरोदे,वनाजी बांगर,प्रवीण पाचरणे,गुलाब कुरकुटे,संजय पालेकर,वसंत वाडेकर,मारुती इष्टे, गणेश भंगे आदी शेतकरी होते. प्रवेशद्वारा समोर झालेल्या सभेत बांगर म्हणाले राज्यसरकारने दिलेली कर्जमाफी आम्हाला मान्य नाही. अटी शर्ती मान्य करून सरसकट कर्ज माफी द्यावी.नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकर्यांना ५० हजार रुपयाऐवजी १ लाखापर्यंत प्रोत्साहन अनुदान द्यावे. यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ.अमोल वाघमारे,वैजंती कोऱ्हाळे, राजू घोडे,प्रमोद खांडगे,तुकाराम गावडे,वंदना वाघचौरे यांनी भाषणे झाली.

उद्योगपतींची कर्जे माफ, मग शेतकऱ्यांना अटींचे ओझे का?

केंद्र सरकारने मोठ्या उद्योगपतींची कर्जे ‘राईट ऑफ’ करताना कोणत्याही अटी-शर्ती लादल्या नाहीत. मग रात्रंदिवस कष्ट करून देशाचा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विविध अटी का घातल्या जात आहेत, अनेक उद्योगपतींनी राज्य व देशातील बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडविले आहे. त्यांच्याविरोधात सरकारने नेमकी कोणती कठोर कारवाई केली, हे आधी जनतेसमोर स्पष्ट करावे.

प्रभाकर बांगर, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *